दोन-तीन वर्षे मुंबईच्या बाहेर भटकंती झाली नव्हती. आरोग्याच्या काही तक्रारींमुळे इच्छा असूनही भटकंती करता येत नव्हती. संतोषने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भटकंतीला जाण्याची विचारणा केली आणि मी त्वरित होकार दिला.
शुक्रवारपर्यंत नेमकं कुठे जायचं हे ठरत नव्हतं – नाईट ट्रेक करायचा की एखाद्या गडावर जावं, असा विचार होता. पण मार्चच्या प्रखर उन्हामुळे तो विचार मागे पडला. शेवटी आमचा निर्णय झाला – अॅक्टिव्हावरून माणगाव मार्गे हरिहरेश्वरला जाऊ, मग सी-रूटने अलिबाग, रेवस फेरीमार्गे भाऊचा धक्का आणि तिथून मुंबईला परतण्याचा बेत ठरला.
शनिवारी माझे काम सकाळी सात वाजता संपणार होते आणि मी मोकळा होणार होतो. संतोषने ऑफिसची कामे शुक्रवारीच संपवून शनिवारची सुट्टी घेतली. ठरल्याप्रमाणे, सकाळी सात वाजता आम्ही मुंबईहून ऐरोली मार्गे माणगावच्या दिशेने निघालो.
सकाळी रस्ते मोकळे असल्यामुळे गाडी न थांबवता जवळपास १३० किमीचा प्रवास करत माणगावच्या आधी आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. एका छोट्याशा धाब्यावर मिसळचा आस्वाद घेतला. गाडी आणि शरीराला अर्धा तास विश्रांती दिली आणि पुन्हा माणगावच्या दिशेने निघालो.
माणगावात येताच ट्रॅफिकला सामोरे जावे लागले. ट्रॅफिकमधून कशीबशी वाट काढत हायवे सोडून हरिहरेश्वर-श्रीवर्धनला जाणाऱ्या रस्त्यावर गाडी वळवली. वाटेत पेट्रोल टाकी भरून हरिहरेश्वरच्या दिशेने निघालो. माणगावपासून हरिहरेश्वर साठ किलोमीटर अंतरावर आहे. पुढील संपूर्ण प्रवास छोट्या-मोठ्या घाटातून आणि वळणावळणाच्या रस्त्यांतून झाला. रस्त्याच्या दुतर्फा लाल माती आणि चिरेबंदी घरे दिसत होती, ज्यामुळे खऱ्या अर्थाने कोकणात दाखलं झाल्याची जाणीव होत होती.
हरिहरेश्वरच्या पाच-सहा किलोमीटर आधी एका आमराईत आम्ही थांबलो. संतोषने आणलेला डबा तिथे उघडला आणि दोघांनी मिळून वनभोजनाचा आस्वाद घेतला. निसर्गाच्या सान्निध्यात खाण्याची मजा काही औरच असते. काही वेळ विश्रांती घेऊन पुन्हा हरिहरेश्वरच्या दिशेने निघालो.
हरिहरेश्वर मंदिराजवळ येताच अथांग पसरलेला समुद्रकिनारा आणि त्याच्या बाजूला असलेला पार्किंग एरिया दिसू लागला. गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लागतात. दुकानांची रांग संपताच प्रवेश कमानीतून मंदिराच्या प्रांगणात दाखल झालो. 
दोन दीपमाळांमधून प्रवेश करताच कोकणी पद्धतीचं कौलारू, टुमदार मंदिर दिसतं. बदलत्या काळात अनेक कोकणातील मंदिरे आधुनिक स्वरूपात रूपांतरित होत असताना, हरिहरेश्वर मंदिराने आपलं पारंपरिक सौंदर्य आणि साधेपणा टिकवून ठेवलाय – यासाठी ट्रस्टचे आभार मानावे लागतील.
भाविकांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मंदिराला प्रदक्षिणा घालत आत प्रवेश करण्यासाठी रेलिंगचा मार्ग बनवला आहे. या मार्गातून प्रथम काळभैरव मंदिरात प्रवेश होतो. हरिहरेश्वर लिंगाचे दर्शन घेण्यापूर्वी काळभैरव आणि योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि पुन्हा काळभैरव-योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
काळभैरवाच्या चार हातांत डमरू, तलवार, त्रिशूळ आणि शीर दिसते, तर गळ्यात मुंडमाला आहे. येथे काळभैरवाला जागृत देवस्थान मानले जाते. आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भक्तमंडळी येथे धार्मिक अनुष्ठाने आणि कौल लावताना दिसतात.
काळभैरव मंदिरातून हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश केला. मंदिराचे गर्भगृह दगडी असून त्यावर लाकडी कोकणी पद्धतीचे बांधकाम आहे. सभामंडपातील लाकडी बांधकामावर कोरीव काम असून विविध मूर्त्या आणि आकृत्या कोरल्या आहेत. मंदिराच्या पारंपारिक स्थापत्य शैलीमुळे बाहेर उष्णता जाणवत असली तरी मंदिराच्या आत मात्र गारवा जाणवत होता.
मंदिराच्या आवारात काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मंदिराला खेटून एक टेकडी आहे. या टेकडीच्या दिशेने पायऱ्या जातात, हाच तो प्रदक्षिणा मार्ग. हा मार्ग एक कोसाचा असल्याने त्याला ‘कोसाचे प्रदक्षिणा मार्ग’ म्हणतात.
पायऱ्यांच्या वाटेने टेकडीवर चढताना अथांग समुद्रकिनारा आणि हरिहरेश्वर मंदिर परिसर दिसू लागतो. टेकडीवरून कौलारू मंदिराचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. टेकडी चढून वर गेल्यावर घळीतून खाली उतरणारी पायऱ्यांची वाट दिसते; पण तिथे न जाता टेकडीच्या माथ्याकडे चालत राहावे.
...
माथ्यावरून हरिहरेश्वर परिसराचे निसर्गसौंदर्य नेहाळता येते.टेकडीवरून मंदिर परिसराला तीन बाजूंनी वेढलेल्या डोंगररांगा, एका बाजूस अथांग पसरलेला समुद्र आणि किनाऱ्यावर वसलेले हरिहरेश्वर मंदिर दिसते.
टेकडी ही जवळजवळ तिन्ही बाजूंनी समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेली आहे. टेकडीवरून सागर किनाऱ्याची तीन वेगळी वेगळी रुप पाहायला मिळतात
पश्चिमेचा किनारा गर्जना करणाऱ्या फेसाळ लाटांचा मारा झेलणारा खडकाळ आहे, उत्तरेला लाटांचे संगीतमय तरंग निर्माण करणारा वालुकामय किनारा आहे, तर दक्षिणेला डोंगररांगांना साथ देत दूरवर पसरलेला समुद्रकिनारा दिसतो.
बर्ड्स आय व्ह्यूमधून हे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवून घळीच्या दिशेने वळावे.
घळीजवळ येताच सागराला भिडणाऱ्या लाटांचे दर्शन होते. टेकडीच्या कातळातून सागरात उतरणारी ही घळ हरिहर तीर्थक्षेत्राचे आयकॉनिक प्रतीक आहे. हरिहरेश्वर म्हटले की ही घळ डोळ्यासमोर येते. घळीच्या पायऱ्यांवरून सागराकडे उतरताना उजव्या बाजूस भग्न अवस्थेत व्याघ्राजवळ उभी असलेली चतुर्भुज देवीची मूर्ती दिसते.
घळीच्या दोन्ही बाजूंना खडकांवर सागराच्या लाटांनी नैसर्गिक कातळशिल्पे कोरली आहेत. काही ठिकाणी सह्याद्री वरील लेण्यांचा भास होतो. सागरदेवतेने साकारलेल्या या कातळ कड्यावरील कॅनव्हासवर वेगवेगळ्या आकृत्यांचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावत निसर्गकृतीचा आनंद घ्यावा.
"समुद्र देवतेने काळाच्या प्रवाहात घडवलेल एक नैसर्गिक कातळशिल्पं जणू मला एखाद्या मंदिरातील कीर्तीमुखाप्रमाणे भासत होत... संतोषला त्यात गणपतीचं दर्शन झालं, माझ्या नजरेने त्या कातळांमध्ये अनेक रूपं, आकार घेत होती. जसं आपण आकाशातले ढग न्याहाळताना कल्पनेच्या पंखांनी विविध आकृत्यांचा मागोवा घेतो, तशीच ही कातळसृष्टीही माझ्या मनात कल्पनांचं विश्व उभं करू लागली... या अद्भुत अनुभवात एक अनोखीच मजा सामावलेली होती."