काळदुर्ग, गरम पाण्याची कुंड आणि वांदरी धरण - एक पावसाळी सहल

 काळदुर्ग, गरम पाण्याची कुंड आणि वांदरी धरण - एक पावसाळी सहल 


पावसाळी सहल – काळदुर्ग, गरम पाण्याची कुंड आणि वांदरी धरण

    ह्या वर्षी अपेक्षेपेक्षा लवकरच पाऊस सुरू झाला. मे महिन्याच्या मध्यातच पावसाची रिपरिप सुरू झाली होती, त्यामुळे जूनच्या सुरुवातीलाच खरी पावसाळी चाहूल लागली. त्यामुळेच १५ जूनला एखादी वर्षासहलीचं आयोजन करावं, असं आमच्या ग्रुपमध्ये ठरलं. सहलीला यायची उत्सुकता आठ जणांनी दाखवली होती. पण ट्रेकिंगसाठी एक अलिखित नियमच असावा—शेवटच्या दिवशी सदस्य गळतातच! आणि तसंच झालं. शेवटी फक्त चार जण उरलो.

    गोरेगावपासून साधारणतः ७५ किमी अंतरावर असलेल्या सफळ्याजवळील काळदुर्ग ह्या किल्ल्याला जाणं ठरलं. त्याचबरोबर परतीच्या वाटेवर वरई नाका परिसरातील सातिवली येथील गरम पाण्याची कुंड आणि वांदरी धरणाला देखील भेट द्यायचं निश्चित झालं. सकाळी सहा वाजता लतेश, विलास पवार आणि मी आमच्या बिल्डिंगसमोर भेटलो. लतेश आणि माझ्या ऍक्टिवा तयार होत्या. दोन ऍक्टिवा आणि चार जण, असा आमचा छोटेखानी पण उत्साही ग्रुप गोरेगाव ते काळदुर्ग अशा रोमांचक प्रवासासाठी निघाला. 
मुंबई ते तुंगारेश्वरपर्यंत रिमझिम पावसाने आम्हाला साथ दिली. पण एकदा वसई ओलांडली की, तुंगारेश्वर ते विरारच्या शिरसाड फाट्यापर्यंत पावसाने चांगलाच जोर धरला. नंतर मात्र त्याने विश्रांती घेतली आणि त्याची जागा घेतली ती महामार्गावरील अफाट ट्रॅफिकने!

    गुगल मॅपने पुढील ३० किमी अंतरासाठी तब्बल दीड तासाचा अंदाज दाखवायला सुरुवात केली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जड वाहने चार-पाच किमी लांब रांगेत उभी होती. पण बाईकस्वार मात्र चपळ मांजरीप्रमाणे, वाहनांच्या फटीतून वाट काढत होते. काही कुटुंबीय मात्र ही गर्दी पाहून परतीचा मार्ग धरत होते. या ट्रॅफिकच्या गोंधळातून आम्ही वरई नाका गाठला आणि तिथून सफाळे-रोड मार्गे दहिसर करत पालघरच्या दिशेने निघालो. एकदा हायवे मागे पडल्यावर, दोन्ही बाजूंनी झाडं, हिरवी शेती आणि ओलसर मातीचा सुगंध वातावरणात दरवळू लागला. गाड्यांचा वेग कमी करत आम्ही निसर्गात मन रमवू लागलो. दहिसर फाटा पार करत वैतरणा नदी ओलांडली आणि आम्ही पालघर मनोहर रोडवर आलो. या रस्त्यावरून जाताना सुंदर सूर्या नदीचे दर्शन घडले. नदी ओलांडल्यानंतर काही वेळातच चहाड घाट लागतो.

    घाट चढू लागल्यावर आजूबाजूच्या कठड्यावर बसलेल्या   माकडांच्या टोळ्या दिसू लागल्या – कधी झाडावरून झेप घेत, तर कधी गाड्यांकडे उत्सुकतेने पाहत. काही वळणं पार करत आम्ही वाघोबा मंदिराजवळ पोहोचलो. इथून कळदुर्ग किल्ल्याचा पायवाटा सुरु होतो. याच मंदिरामुळे हा घाट वाघोबा घाट म्हणूनही ओळखला जातो.

वाघोबा मंदिर
वाघोबा मंदिर

    मंदिराजवळील पार्किंगमध्ये आमच्या ऍक्टिव्हा उभ्या केल्या. आमच्या आधी दहा-बारा बाइक तिथे होत्या, प्रत्येकावर दगड ठेवलेले. सुरुवातीला बाइकवर दगड पाहून आश्चर्य वाटलं, पण नंतर त्यामागचं कारण कळलं. ज्यांनी दगड ठेवले होते, त्यांना त्याचा काही उपयोग झाला नव्हता. माकडांनी दगड बाजूला करून बाइकच्या सीट्स फाडल्या होत्या! ट्रेकच्या शेवटी हा उलगडा झाला.गाड्या पार्क करून आम्ही वाघोबा मंदिरात दर्शनासाठी गेलो.

वाघ देवतेची तांदळा मूर्ती
वाघ देवतेची तांदळा मूर्ती 

     मुख्य मंदिरात वाघोबाची तांदळा मूर्ती आहे, तर बाजूला शेंदूर लावलेल्या पाषाण देवता आहेत. पालघर हा बहुसंख्य आदिवासींचा जिल्हा आहे आणि आदिवासींचा मुख्य देव म्हणजे वाघोबा. त्यामुळे या घाटाच्या रक्षक देवतेचं मंदिर याच ठिकाणी बांधलं असावं, कारण हा एकेकाळी प्राचीन व्यापारी मार्गाचा भाग होता. वाघोबाच्या  मंदिराच्या बाजूला महादेवाची पिंड आहे. मंदिराच्या शेजारी विकी कृष्णन यांचं टपरीवजा दुकान आहे. पंधरा दिवस आधी सांगितल्यास ते पर्यटकांसाठी जेवणाची व्यवस्था करतात. (फोन: 9049966585) वाघोबाचं दर्शन घेऊन आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली.

वाघोबा मंदिराकडून जाणारी वाट
वाघोबा मंदिराकडून जाणारी वाट

    मंदिरात वाघोबा देवाचे दर्शन घेऊन आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली. मंदिराच्या मागच्या बाजूने किल्ल्यावर जाणारी बांधिव पायऱ्यांची वाट आहे. काही अंतरावर ही वाट प्रशस्त मळलेल्या पायवाटेत रूपांतरित होते. वाटेत एक छोटा पठार वगळता संपूर्ण वाट सलगपणे दाट जंगलातून सरळ किल्ल्याकडे जाते, त्यामुळे या किल्ल्यावर वाट चुकण्याची शक्यता कमी असते. ही वाट उभ्या चढाईची असून लाल मातीमुळे पावसात निसरडी झालेली असते. दाट झाडाझुडपांमुळे जरी सूर्यकिरण थेट पोहोचत नसले तरी कोकणातील दमट हवामानामुळे शरीर घामाघूम होते.


    पायथ्यापासून रमत-गमत साधारण पाऊण तासात आम्ही पठारावर पोहोचलो. या पठाराला गडाची माची म्हणता येईल. तसं पाहिलं तर थेट चालत गेल्यास अर्ध्या तासातच पठार गाठता येतं. त्यावेळी संपूर्ण पठार धुक्याच्या वेढ्यात हरवून गेलं होतं, त्यामुळे आम्हाला काहीही वास्तू स्पष्टपणे दिसल्या नाहीत. मात्र, धुकं जरासं बाजूला झालं की पायथ्याशी असलेल्या राहाळ गावाचं सुंदर दृश्य नजरेस येत होतं. पठारावर काही वेळ घालवून आम्ही गडमाथ्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

घनदाट जंगलातून जाणारी वाट
घनदाट जंगलातून जाणारी वाट

पुढील संपूर्ण वाट उभ्या चढाईची असून दाट झाडीतून जाते. जसजसं पुढे जात होतो, तसतसं वातावरणात धुक्याचं प्रमाण वाढत जात होतं. वाटेत गोगलगाय, बेडूक, खेकडे यांसारख्या प्राण्यांचे दर्शन घडले. त्याचबरोबर हळदीच्या फुलांचेही दर्शन झाले.

रानहळदीचे फुल
रानहळदीचे फुल

    वाटेवर लालसर दिसणारे खेकडे हे मादा खेकडे होते. पावसाळ्यात ते आपल्या पोटात असंख्य पिल्लं घेऊन फिरताना दिसतात. येथील डोंगरी लालसर खेकडे तुलनेने कमी आक्रमक व अचपळ वाटले, त्यामुळे त्यांचे फोटो मोबाईलमध्ये टिपणं सहज शक्य झालं.

पिल्ले पोटात घेऊन फिरणारी मादी खेकडा
पिल्ले पोटात घेऊन फिरणारी मादी खेकडा

    पाऊण तास चालल्यानंतर धुक्याच्या आच्छादनातून गडमाथा अंधुकसा दिसू लागला. इथून जंगल संपतं आणि एक आडवा, पण सोपा रॉकपॅच पार केल्यावर वाट कातळखडकातून वर चढते. वर पोहोचल्यावर भग्न अवस्थेतील किल्ल्याच्या भिंतींचे अवशेष दिसू लागतात. तुटलेल्या,भिंतीच्या सरळ रेषेत असलेल्या पायऱ्यांच्या वाटेने वर जाता येतं, पायऱ्यानं जवळ कधीकाळी गडाचे प्रवेशद्वार असावे असं वाटतं. या पायऱ्यांवरून वर गेल्यावर अधिकृतपणे गडाच्या हद्दीत प्रवेश होतो.

तटबंदीजवळील भग्न अवस्तेतील प्रवेशद्वाराच्या खुणा
तटबंदीजवळील भग्न अवस्तेतील प्रवेशद्वाराच्या खुणा

    थोडं पुढे चालल्यावर एक छोटं पाण्याचं टाकं लागतं. त्यापासून दहा-पंधरा पावलं वर गेल्यावर एक छोटंसं पठार लागतं, ज्याला गडाची दुसरी माची म्हणता येईल. संपूर्ण गड दाट धुक्याच्या कुशीत लपलेला होता. त्यामुळे बालेकिल्ल्याचं दर्शन होणं शक्य नव्हतं. मात्र त्या धुक्यात हरवण्याची मजाच काही और होती. माचीवर थांबून अधूनमधून धुक्याची चादर बाजूला सरकली, की गडाच्या पायथ्याखालील प्रदेशाचं सौंदर्य खुलं होतं आणि मन मोहून टाकायचं.

गडावर प्रवेश करताच दिसणारे पाण्याचे टाके - क्र १
गडावर प्रवेश करताच दिसणारे पाण्याचे टाके - क्र १



    आमच्याआधी दोन तासांपूर्वी आलेले काही पर्यटक धुके निवळण्याची वाट पाहून शेवटी निराश होऊन परत निघून गेले होते. आम्ही मात्र माचीवर थांबून, सोबत आणलेला खाऊ खात शांतपणे वातावरणाचा आनंद घेत राहिलो. तेवढ्यात लहान मुलांचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहिलं, तर एक पाच वर्षांची चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत गडफेरीला आली होती. पायथ्यापासून गडमाथ्यापर्यंतचा खडतर प्रवास तिने छोट्याछोट्या पावलांनी पूर्ण केला होता. तिच्या पालकांनी तिला इतक्या लहान वयात गडभ्रमंतीची आवड लावली हे पाहून खूप आनंद झाला. तिच्याशी थोडा संवाद साधला.

गड भ्रमंतीस आलेली पाच वर्षांची चिमुरडी
गड भ्रमंतीस आलेली पाच वर्षांची चिमुरडी

    थोडंसं धुकं कमी झाल्यावर आम्ही गडाच्या बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. बालेकिल्ला म्हणजे गडाचा सर्वोच्च माथा. काळदुर्ग हा आयताकृती खडकावर वसलेला असून त्याचा उत्तर दिशेकडील चौकोनी भाग बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला माचीपासून अंदाजे दोन-तीन मीटर उंचीवर असून, तेथे जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पाच-सहा पायऱ्या आहेत.

बालेकिल्याच्या पायऱ्या
बालेकिल्याच्या पायऱ्या 

या पायऱ्यांमधून वर गेल्यावर आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. तिथे एक छोटंसं पाण्याचं टाकं आणि एक ध्वजस्तंभ आहे. स्वच्छ हवामान असेल तर येथून वसलेले आसवा, अशेरी, कहोज गड सूर्या-वैतरणा नद्या आणि त्यांचा संगमसुद्धा पाहता येतो. पण त्या दिवशी धुक्याने संपूर्ण परिसर व्यापलेला असल्यामुळे आम्हाला काहीच दिसलं नाही.

पाण्याचे टाके - क्र २
पाण्याचे टाके - क्र २ 

    थोडा वेळ बालेकिल्ल्यावर घालवून आम्ही पुन्हा माचीवर आलो. तेथून बालेकिल्ल्याच्या कातळकड्याला चिकटून असलेल्या पूर्वेकडील वाटेने आम्ही गडावरील मोठ्या टाक्याकडे गेलो. टाकं पाहून परत माचीवर आलो. मनात एक इच्छा होती — गडाच्या विरुद्ध दिशेला उतरणाऱ्या वाटेवर असलेल्या मेघोबाच्या मंदिराला भेट द्यायची. आम्ही ती वाट शोधण्याचा प्रयत्न केला, पण धुक्याच्या दाट आवरणामुळे ती वाट सापडली नाही. अशा अवस्थेत वाट चुकण्याचा धोका मोठा असल्यामुळे तो प्रयत्न सोडून देऊन गड उतरायचं ठरवलं.

पाण्याचे टाके - क्र ३
पाण्याचे टाके - क्र ३

    काळदुर्गावर त्यावेळी पावसाचे वातावरण होते, आभाळ  ढगांनी भरलेलं होतं, पण तरीही एक थेंबही अंगावर पडला नाही. चढाई करताना मात्र घामाने आम्ही पूर्ण भिजलो होतो. त्यामुळे पावसाच्या थेंबांची आस अधिकच तीव्रतेने लागून राहिली होती. किल्ल्याचं दुसरं नाव 'काळमेघ' — गडदेवताही मेघोबा — पण त्या दिवशी मेघोबाने आमच्यावर जलवर्षाव करण्याची कृपा दाखवली नाही. मेघांच्या अधिपतीने आमच्याकडे दुर्लक्षच केलं, असंच वाटत होतं!


काळदुर्ग माहिती

किल्ल्याची नावे: काळदुर्ग, काळमेघ, नांदीमाळ

उंची: सुमारे १५५० फूट

प्रकार: गिरिदुर्ग

उपयोग: टेहळणी (सुरक्षा व देखरेख)

चढाईची श्रेणी: सोपी – पावसाळ्यात मध्यम


संपूर्ण माहिती:

    काळदुर्ग किल्ला हा पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात वसलेला एक गिरिदुर्ग आहे. किल्ल्याची उंची अंदाजे १५५० फूट असून तो पालघर पर्वतरांगेतील एक महत्त्वाचा गिरीदुर्ग मानला जातो. या किल्ल्याचा उपयोग प्राचीन काळी केळवे, महिम, डहाणू आणि सुपारक (नालासोपारा) या बंदरांमार्गे होणाऱ्या व्यापारावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. सूर्या, वैतरणा, तानसा आणि नांद्या नद्यांच्या खोऱ्यातून होणाऱ्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी पालघर परिसरात अनेक डोंगरी किल्ले बांधले गेले, त्यात काळदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे.

    किल्ल्याचा माथा आयताकृती असून त्यामुळे हा गड दूरवरून सहज ओळखता येतो. गडावरती तीन पाण्याची खोदीव टाके, भग्नावस्थेतील तटबंदीचा पायाचा काही भाग शिल्लक आहे.एवढेच काही अवशेष आज पाहायला मिळतात. "गडावर पोहोचायला साधारण एक ते दीड तास लागतो. गडाचा संपूर्ण फेरफटका मारून, प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी थांबून पाहायचं झाल्यास साडेतीन ते चार तास भरपूर वेळ आहे."


इतिहास:

    काळदुर्ग किल्ल्याचा सविस्तर इतिहास उपलब्ध नसला तरी, पोर्तुगीज सत्ताकाळात तो त्यांच्या अधिपत्याखाली होता. काही काळ संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांकडे गेला, परंतु नंतर पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. १७३७-१७३९ च्या दरम्यान चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेदरम्यान मराठ्यांनी पुन्हा एकदा या किल्ल्यावर ताबा मिळवला.


कसे जावे:

    मुंबईहून रेल्वेने पालघर रेल्वे स्थानक गाठावे. तिथून ‘मनोर’कडे जाणारी बस किंवा स्थानिक ‘टमटम’ने प्रवास करून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘वाघोबा’ मंदिराजवळ उतरावे. या ठिकाणाला 'वाघोबा खिंड' म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय महामार्गावरून मनोरजवळील ‘मस्तान नाका’ १४ किमी अंतरावर आहे, तर ‘वरई नाका’पासून १६ किमीवर वाघोबा खिंड लागते.


गड उतरतानाचे अनुभव

    गड उतरताना सुरुवातीला वाटलं होतं की पायथा लवकर गाठता येईल. पण पवारांचा पाय थोडा मुरगळल्यामुळे आमचा वेग कमी झाला आणि उतरणीत उशीर झाला. संपूर्ण पायवाट काही अपवाद वगळता लालसर मऊ मातीची असून सरळ उतरणीची आहे. त्यामुळे त्यांच्या चपला घसरत होत्या आणि सावधपणे चालावं लागत होतं. पठारा पर्यंत पोहोचतो तोपर्यंत दुपारचे एक वाजले होते.

    एवढा वेळ गड धुक्याच्या चादरीत लपलेला होता, पण आता अचानक धुकं पूर्णपणे गायब झालं. त्याची जागा तिव्र ऊन्हाने घेतली होती. जणू काही धुक्याने आम्हाला निरोप देण्यासाठी मागे हटून गडमाथा शेवटचं दर्शन घडवलं!

पठारावरून दिसणारा काळदुर्ग
पठारावरून दिसणारा काळदुर्ग

    पठारावरून उतरताना अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. विशेष म्हणजे संपूर्ण ट्रेकदरम्यान एक थेंबही पाऊस नव्हता, पण इथल्या दमट हवामानामुळे मात्र चढतानाही आणि उतरतानाही अंग पूर्ण भिजून गेलं होतं. विलास आणि लतेश आधीच पायथ्याशी पोहोचले होते. मी मात्र पवारांना साथ देत सावकाश उतरत होतो. खाली पोहोचलो तेव्हा माकडांच्या टोळीचा धुडगूस सुरु होता! सकाळी वाघोबा मंदिराजवळ एकही माकड दिसलं नव्हतं. लेखाच्या सुरुवातीलाच उल्लेख केलेली "बाईकच्या सीटवर दगड ठेवण्याची" कारण माकडांपासून संरक्षण हेच होतं.    पण त्याचं फारसं काही उपयोग झालं नव्हता – माकडांनी दगड बाजूला फेकून काही बाईकच्या सीट्स अक्षरशः फाडून टाकल्या होत्या. एका बाईकची संपूर्ण सीट त्यांनी कुरतडून टाकली होती! माझ्या Activa वर दोनच ओरखडे दिसले, पण बाकी गाड्यांवर चिखलाचे ठसे आणि खोडसाळपणाचे पुरावे स्पष्ट दिसत होते.


महत्वाच्या सूचना

पिण्याचं पाणी: गडाच्या पायथ्यापासून गडमाथ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही. गडावर तीन पाण्याची टाकी आहेत, पण त्यातलं पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आवश्यक तेवढं पाणी स्वतःसोबत नक्की घ्यावं.

चढाई/उतराई: गडाची पायवाट काहीशी खडी व निसरडी आहे, विशेषतः पावसाळ्यात. चांगल्या ग्रिपची पादत्राणे वापरावीत.

माकडांपासून सावध: गाड्या लावताना माकडांपासून होणाऱ्या त्रासाची काळजी घ्यावी. किमती वस्तू माकडांपासून दूर ठेवाव्यात.

सकाळी लवकर चढणे योग्य: इथलं वातावरण दमट असल्यामुळे सकाळी लवकर गड चढायला सुरुवात केल्यास हवा आल्हाददायक असते आणि धुक्याचे सौंदर्यही अनुभवता येते.


व्यक्तिगत आनंद

    दोन वर्षांपूर्वी झालेल्या मोठ्या कार्डियाक इव्हेंटनंतर हा माझा पहिलाच 'हाईट गेनिंग' ट्रेक होता. या संपूर्ण प्रवासात मला कोणताही त्रास न होता मी गड चढून उतरू शकलो, हे माझ्यासाठी एक मोठं यश होतं – एक आश्वासक आणि आत्मविश्वास देणारा क्षण!


गरम पाण्याची विश्रांती आणि वंडारीचा शेवट

    वाघोबा मंदिरामधून बाहेर पडल्यानंतर आम्ही चाहाड घाट उतरून सातावलीच्या गरम पाण्याच्या कुंडांकडे निघालो. चाहाड घाटात वाहणारा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे विशेष आकर्षण असतो. पण यावर्षी दक्षिण कोकण आणि मुंबईत चांगला पाऊस पडत असतानाही, या पट्ट्यात हवा तसा जोरदार पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे घाटातील धबधबे अजून सजीव झाले नव्हते – काहीसे कोरडे, गप्प वाटत होते.

    घाट उतरल्यावर लतेशने पेट्रोलपंपावर गाडी भरली आणि नेमकं त्याच वेळी पाऊस सुरू झाला. त्या घाईगडबडीत आम्ही पेट्रोलपंपाच्या पुढे असलेला उजवीकडचा वळण (राईट टर्न) घ्यायचा विसरलो आणि वरई नाक्यावर जाण्याऐवजी थेट मनोरजवळील मस्तान नाक्यावर पोहोचलो! त्यामुळे सातावलीपर्यंतचं अंतर जवळपास १५ किमीने वाढलं.

    मस्तान नाक्यावर असलेल्या विठ्ठल कामत हॉटेलमध्ये पोटपूजा केली आणि मग सातावलीच्या गरम पाण्याच्या कुंडांकडे मोर्चा वळवला.

सातवलीची गरम पाण्याची कुंडे
सातवलीची गरम पाण्याची कुंडे

    इतर गरम पाण्याच्या कुंडांपेक्षा मला सातावलीची कुंड अधिक आवडतात. इथे टप्प्याटप्प्याने तीन वाहती कुंड आहेत आणि प्रत्येक गुरुवारी ती स्वच्छ केली जातात. स्त्री-पुरुषांसाठी वेगळी कुंड असल्यामुळे प्रत्येकाला जलचिकित्सेचा मनसोक्त अनुभव घेता येतो. गरम पाण्यातील आंघोळीमुळे शरीरावरचा थकवा, शिण आणि ताण पूर्णपणे निघून गेला – एक विलक्षण विश्रांती अनुभवायला मिळाली.

    कुंडातून बाहेर पडेपर्यंत सायंकाळचे पाच वाजले होते. त्यानंतर आम्ही हायवे पार करून साधारण पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वांदरी धरणाकडे गेलो. पावसाची सुरुवात नुकतीच झाल्यामुळे धरण बऱ्यापैकी कोरडा होता, पण तिथलं शांत, निसर्गरम्य वातावरण भटकंतीला एक सुंदर विराम देणारं ठरलं.

कोरड पडलेल वांदरी धरण
कोरड पडलेल वांदरी धरण

धरणाजवळ काही वेळ विसावल्यानंतर सायंकाळी पावणे सहा वाजता आम्ही मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला.


Post a Comment

0 Comments