अलिबागातील कुलाबा किल्ला भटकंती अनुभव
करमकर शिल्प संग्रहालयातील शिल्प वैभव पाहून भटकंतीच्या निमित्ताने येथे आल्याचे सार्थक झाले असे वाटले. कनकेश्वर मंदिरात भारतीय मध्ययुगीन काळातील कारागिरांचे शिल्प वैभव पाहिले आणि त्याच परिसरात आधुनिक भारतातील शिल्पकारांनी पाश्चात्य शैलीत घडवलेली शिल्पे पाहण्याचा योग या भटकंतीत आला. सर्व शिल्प वैभव डोळ्यांत साठवून आम्ही अलिबागच्या दिशेने कुलाबा किल्ला पाहण्यासाठी निघालो.
दुपारचे २ वाजले होते. ओहोटीची वेळ ४ ची होती आणि अलिबाग १८ किलोमीटर दूर होते. अलिबागला पोहोचून जेवण करून किल्ल्यावर जायला आमच्या हातात फक्त दोन तास होते. आमची चौकडी सासवणे गावावरून अलिबागच्या दिशेने निघाली.
अलिबागमधील एका हॉटेलमध्ये पोटपूजेसाठी थांबलो.जेवण संपेपर्यंत पावणे चार वाजले होते. हॉटेलपासून अलिबाग चौपाटी फक्त ९०० मीटरवर होती. चार वाजता चौपाटीवर पोहोचून गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो.
अलिबाग चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पश्चिम दिशेला समुद्रात कुलाबा किल्ला आणि सर्जेकोट ही दुर्गद्वयी दर्शन देत होती. हे दोन्ही किल्ले मिश्रदुर्ग प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हे किल्ले चारही बाजूंनी पाण्याने वेढले जातात आणि जलदुर्ग बनतात; तर ओहोटीच्या वेळी किल्ल्यापर्यंतची जमीन उघडी पडते आणि ते भुईकोट बनतात.
किनाऱ्यापासून कुलाबा किल्ला सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. ओहोटीच्या वेळी चालत जाता येते किंवा टांगा घेऊनही जाता येते. त्यामुळे किल्ल्यावर येताना ओहोटी-भरतीची वेळ पाहून नियोजन करावे लागते. चार वाजता पूर्ण ओहोटी लागली होती, आम्ही चालत किल्ल्याच्या दिशेने निघालो.
किल्ल्यावर प्रवेशासाठी २० रुपये शुल्क आकारले जाते. इथली पद्धत थोडी वेगळी आहे – QR कोड स्कॅन करून थेट साइटवर शुल्क भरावे लागते. त्यात आमचा वेळ गेला, कारण नेटवर्क नसल्याने वॉलेटमधून पैसे ट्रान्सफर होत नव्हते. शेवटी तेथील एका स्थानिक व्यक्तीच्या मोबाईलद्वारे नोंदणी करून आम्ही शुल्क भरले.
प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत आहे. दरवाजावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दरवाजातून आत गेल्यावर आपण दुसऱ्या दरवाजाकडे जातो, आता त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडताच आपण किल्ल्यात प्रवेश करतो. समोर पुरातत्व खात्याने किल्ल्याची माहिती लिहिलेला फलक आहे. त्याच्या पुढे गुलवती देवीचे (महिषासुरमर्दिनीची मूर्ती असलेले) मंदिर आहे.
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला भवानी मातेचे मंदिर आहे.
किल्ल्याची माहिती वाचून आम्ही भवानी मातेच्या मंदिराकडे गेलो. मंदिरासमोर तुळशी वृंदावन आहे. पूर्वी हे मंदिर कौलारू असावे; आता त्यावर पत्रे लावले आहेत.
गाभाऱ्यात दोन तांदळ्या मूर्ती आहेत – एकीला दोन डोळे कोरले आहेत, तर दुसरीला भवानी मातेचा पितळी मुखवटा लावलेला आहे. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला इतर देवतांचे टाक ठेवलेले आहेत. एकंदरीत हे मंदिर जुन्या कोकणातील ग्रामदेवतेच्या मंदिरासारखे वाटते.
मंदिर पाहून झाल्यावर समोर बुर्जावर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. त्या चढून आम्ही किल्ल्याच्या तटबंदीवर गेलो. बुर्जावरून अलिबाग शहर दिसत होते. त्या बुर्जावर अलिबाग शहराच्या दिशेने दोन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिरासमोरील बुर्जावरून महादरवाजावरील बुर्जाकडे गेलो. त्या बुर्जावरून किल्ल्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवता येते.
आम्ही उत्तर दिशेने तटबंदीवरून संपूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याचे ठरवले. महादरवाजापुढील तटबंदीवरील बुर्जावर ध्वजस्तंभ उभारलेला होता.
किल्ल्याच्या पूर्व-उत्तर कोपऱ्यातील बुर्जावर दोन मोठ्या तोफा उत्तर दिशेने ठेवलेल्या आहेत. तोफांसमोर उंदेरी आणि त्याच्या बाजूचा स्वराज्यातील खांदेरी किल्ला तसेच थळचा समुद्रकिनारा दिसतो. पूर्वेस अलिबाग शहर आणि कुलाब्याचा पडकोट असलेला सर्जेकोट दिसू शकतो, पण बुर्जाजवळील उंच झाडीमुळे सध्या ते दिसत नव्हते.
शिवाजी महाराज आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, ‘‘किल्ल्याजवळ डोंगर (पर्वत) असल्यास तो सुरुंग लावून फोडावा किंवा शक्य नसल्यास त्या डोंगरावरही किल्ला बांधावा.’’ यामुळे मुख्य किल्ल्याला संरक्षण मिळते; अन्यथा शत्रू मोक्याच्या जागेवर मोर्चे लावून किल्ला जिंकू शकतो. या आज्ञेनुसारच बहुतेक संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याजवळील खडकावर सर्जेकोट बांधला आणि त्याला कुलाब्याशी जोडणारा दगडी सेतू बांधला.
खांदेरी बेटावर शिवाजी महाराजांनी १६७९ साली मुंबईतील इंग्रज आणि सिद्दीवर वचक ठेवण्यासाठी किल्ला बांधला होता; पण जवळच्या उंदेरी बेटाकडे दुर्लक्ष झाल्याने सिद्दीने त्याचा ताबा घेऊन किल्ला बांधला आणि मराठ्यांना कायमची डोकेदुखी झाली. कदाचित या घटनेतून बोध घेऊनच सर्जेकोट बांधला गेला.
तोफा पाहून झाल्यावर उत्तर तटबंदीवरून पश्चिम दिशेकडे गेलो.
तटबंदीवरून किल्ल्याचे अवशेष स्पष्ट दिसत होते. पश्चिम तटबंदीवरील यशवंत दरवाजा (दरिया दरवाजा) वरील बुर्जावर पोहोचलो. त्या बुर्जावरून पश्चिमेकडील खडकाळ बाजूस हनुमान मंदिर दिसते. तेथे मराठा काळात गोदी होती, जिथे नौका बांधणी आणि दुरुस्तीचे काम चालायचे. या बुर्जावरून किल्ल्याच्या आतील भागात तसेच पश्चिम, उत्तर आणि दक्षिण बाजूच्या समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवता येते.
दरिया दरवाजावरून पुढे दक्षिण तटबंदीवर गेलो. तेथून किल्ल्यातील पुष्करणी, एक शौचकूप, तटबंदीतील खोली, घुमटी आणि तुळशी वृंदावन समाधी दिसते.
किल्ल्यात हाजी कमलुद्दीन शाह यांचा दर्गाही आहे. तटबंदीवरून प्रदक्षिणा पूर्ण करून भवानी देवीसमोरील तटबंदीकडे आलो. तेथून चालत येणारे आणि टांग्यावरून येणारे पर्यटक दिसत होते. तटबंदीवरील दोन तोफांचे पुन्हा दर्शन घेऊन आम्ही संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण केली.
प्रदक्षिणा संपल्यावर तटबंदीवरून खाली उतरून सिद्धिविनायक मंदिर, दरिया दरवाजा आणि पुष्करणी पाहण्यासाठी निघालो. सिद्धिविनायक मंदिराकडे जाताना वाटेत कान्होजी आंग्रे यांच्या वाड्याचे आणि इतर गडावरील लोकांच्या घरांचे भग्न अवशेष दिसत होते. उजव्या बाजूला पुष्करणी होती; तिथे गर्दी असल्याने प्रथम सिद्धिविनायक मंदिराकडे गेलो
. १७५९ साली राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. गणेशमूर्ती संगमरवराची असून बाजूला रिद्धी-सिद्धी दाखवल्या आहेत. मूर्ती उजव्या सोंडेची असून उंची दीड फूट आहे. येथे गणेश पंचायतन आहे – गणपतीसह सूर्य, देवी, शिव आणि विष्णू यांच्या मूर्ती आहेत.
मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर सुंदर नक्षीकाम आहे. वरच्या भागात कृष्ण आणि देवी कोरलेली आहेत; खाली दोन द्वारपाल आहेत. संपूर्ण चौकटीवर वेलबुट्टी, फुले आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत.
मंदिर आतून जितके सुंदर आहे तितकेच बाहेरूनही. शिखरावर विविध मूर्ती आणि नक्षीकाम आहे. मंदिराबाहेर तुळशी वृंदावन सुंदर दगडी नक्षीकामाने सजलेले आहे. मंदिर परिसरात देवचाफ्याच्या फुलांनी वातावरण सुगंधित झाले होते.
तुळशी वृंदावनाकडून शंकर मंदिरात गेलो. तेथे शिवपिंड आहे आणि समोर विरस्मृतीशिळा ठेवलेली आहे. नंतर हनुमान मंदिरात गेलो. तेथे द्रोणागिरी पर्वत उचललेल्या हनुमानाची मूर्ती आहे; पायाखाली साडेसाती/पाणवती चिरडलेली दाखवली आहे.
वेळ कमी असल्याने आम्ही उर्वरित किल्ला जलदगतीने पाहत होतो. फक्त अर्धा तास उरला होता आणि परतीच्या फेरीबोटीचे नियोजन करायचे होते. मंदिराकडून पुष्करणीकडे गेलो.
पुष्करणीचा प्रवेशद्वार मंदिरासारखा आहे; त्यावर श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. आत गेल्यावर भव्य चौकोनी दगडी पुष्करणी दिसते. चारही बाजूंना दगडी भिंत आहे.
पुष्करणी पाहून किल्ल्याच्या दक्षिण टोकाला असलेला यशवंत दरवाजा पाहायला गेलो. दरवाजापूर्वी एक घुमटी आहे. आत गेल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी दिवड्या आहेत. यशवंत दरवाजाचा लाकडी दरवाजाही आजही शाबूत आहे.
समुद्राकडील दगडी चौवकडी वरील आडव्या पट्टी वर रिद्धी-सिद्धीसह गणपती, मगर, कमळे, वेलबुट्टी कोरलेली आहेत. दगडी चौवकटीच्या उभ्या पट्टीवर गरुड आणि मारुती कोरलेले आहेत. किल्ल्याच्या तटा जवळ गोदीचे अवशेष आहेत; तेथे नवीन जहाजे बांधली व जुनी दुरुस्त केली जात असत. म्हणून याला गोदी दरवाजाही म्हणतात.
यशवंत दरवाजा पाहून महादरवाजाकडे परतलो. वाटेत महिषासुरमर्दिनीची मूर्ती पाहिली आणि किल्ल्याबाहेर पडलो.
बाहेरील परिसरात सर्जेकोट दिसत होता, पण वेळेअभावी तेथे जाणे शक्य नव्हते. आमच्याकडे फक्त एक तास उरला होता; ७ ची शेवटची फेरी होती आणि घड्याळात सहा वाजले होते.
गुगल मॅपवर रेवस फेरी बोट जेट्टी टाकल्यास एक तास लागेल असे दिसत होते. गाडी पार्किंगमधून काढणे, अलिबागच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडणे यात वीस-पंचवीस मिनिटे जाणार होती. हे सर्व गणित मांडता फेरी मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे बायरोड मुंबईला जायचे ठरले.
सूर्य मावळतीला लागला होता. त्याच्या लालिमेने संपूर्ण क्षितिज उजळून निघाले होते. किल्ल्यावरील मावळता सूर्य एखाद्या अंगठीतील हिऱ्यासारखा दिसत होता. हे दृश्य न्याहाळून आम्ही कान्होजी आंग्रे स्मारक पाहायला गेलो.
खेदाची गोष्ट म्हणजे तेथे चौकशी केल्यावर तीन-चार जणांना कान्होजी आंग्रे स्मारक किंवा स्वतः कान्होजी आंग्रे कोण हे माहिती नव्हते. तेथे काम करणारे परप्रांतीय दुकानदार, रिक्षावाले आणि दुर्दैवाने एक मराठी मुलगाही होता.
अलिबाग परिसर पर्यटनस्थळ बनला आहे; सेल्फी, समुद्रस्नान आणि मौजमजा यापलीकडे येथील ऐतिहासिक महत्त्व लोकांना माहिती नाही हे खेदजनक आहे. ज्या कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या पराक्रमाने हा परिसर जागतिक पटलावर नेला, त्यांचेच नाव माहित नसणे ही त्यांच्या शौर्याची मोठी उपेक्षा आहे.
स्मारक दुरुस्तीसाठी बंद असल्याने बाहेरूनच पाहून आम्ही अलिबागची भटकंती संपवली आणि मुंबईच्या दिशेने निघालो.
0 Comments